राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस   

मेघगर्जनेसह वादळी वार्‍याचा अंदाज 

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. 
 
मागील २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत घट झाली. राज्यात काल नागपूर येथे उच्चांकी ४०.६ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. 
 
कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तसेच दोन दिवस विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (रविवारी) छ. संभाजीनगर, नाशिक, सांगली, सिंधुदुर्ग, धुळे, नदुरबार, पुणे, सातारा, जालना, बीड या जिल्ह्यात मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. पुढील चार दिवसांसाठी संपूर्ण विदर्भासह, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. आज राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 
 
मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने कमाल आणि किमान तपमानात घट झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण कायम असणार असल्याने तपमानात वाढ होणार नसल्याचा अंदाज आहे. तपमानात घट झाल्याने ऊन्हाची तीव्रता कमी झाली असून उकाड्यातही घट झाली आहे. त्यामुळे ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ढगाळ आणि पावसाळी वातावरण निवळल्यानंतर पुन्हा तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. 
 
पुण्यात पाच दिवस पाऊस  
 
पुणे शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शहरातील कमाल आणि किमान तपमानात ३ ते ४ अंशाने घट होणार असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील घाट विभागातही पाच दिवस पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 
 
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस 
 
एक कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य अरबी समुद्रापासून वायव्य मध्य प्रदेशापर्यंत (उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र मार्गे) जात आहे. आणखी एक कमी दाबाचा पट्टा पूर्व उत्तर प्रदेशापासून आग्नेय तेलंगणापर्यंत (पूर्व मध्य प्रदेश व विदर्भ मार्गे) जात आहे. या दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम असणार असल्याने ढगाळ वातावरणासह पाऊसही असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

 

Related Articles